मुमेवाडी - उत्तूर रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी एसटी बस व मालवाहतूक टेंपोचाआपघात झाला .यामध्ये २७ प्रवासी जखमी झाले. एस टी बसमध्ये प्रवाशांनची संख्या जास्त होती. दैवबलवत्तर म्हणून फार जिवितहानी झाली नाही.यासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाने "देवदूत" म्हणून भूमिका बजावली.त्या ठिकाणी जर झाड नसते, तर एस टी थेट ४०फुट खोल असलेल्या शेतात पलटी झाली असती.आणि निश्चित जिवितहानी झाली असती. मात्र चालकाचे प्रसंगावधान व झाडाने बसला दिलेला आधार यामुळे जीवितहानी टळली. मात्र आता रस्ता रुंदिकरणात या झाडावर कु-हाड चालवली आणि एकेकाळी ज्या झाडांचे अनेकांचे प्राण वाचवले त्या झाडाला जमीनदोस्त व्हायची वेळ आली.
यापूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. बेलेवाडी ते मुमेवाडी या दरम्यान ८६५ लहान मोठी झाडे तोडण्यात आली. जुलै २०१७ मध्ये उतूर -आजरा मार्गावरील १७६ झाडांची बेकायदा कत्तल झाली.वनविभागाने यावेळी पंचनामा केला होता. मात्र या दोन्ही रस्त्यावर नवीन वृक्षारोपण झाले नाही. उतूर -मुमेवाडी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू आहे सध्या हा मार्ग झाडांविना पोरके झाला आहे. रस्त्यावरील सावली हरवल्याने प्रवाशांचेही ऐन उन्हाळ्यात हाल होणार आहेत. याभागातील रस्त्यांची व तेथे असणाऱ्या झाडांच्या संख्येमुळे व सावलीमुळे एकप्रकारची वेगळी ओळख निर्माण झाली होती. लांबच्या प्रवासाला निघालेले प्रवासी किंवा कुटुंबीय रस्त्याकडेच्या मोठ्या झाडाची दाट सावली पाहून विश्रांतीसाठी, जेवण करण्यासाठी एकत्रित बसत असल्याचे चित्र रस्त्यावरून पहावयास मिळत होते. मात्र आता झाडेच नसल्याने या रस्त्याला भकासपण आले आहे.
प्रतिक्रिया..
रस्ता रुंदीकरण ही जरी काळाची गरज असली तरी झाडांची झालेली कत्तल भरुन काढली पाहिजे.रस्त्याकडेची झाडे बऱ्याच वेळेला अपघातातील वाहनांना खड्ड्यात किंवा दरीत कोसळताना झाडाला वाहन तटल्यामुळे अनेकांचे जीव वाचवतात.तसेच उन्हाळ्यात तापमानात वाढ होते तेव्हा रस्त्यांच्या पृष्ठभागाचे तापमान कमी ठेवण्याचे काम झाडांच्या सावलीमूळे होते . त्यामुळे वाहनांचे टायर फुटण्याचे प्रमाण कमी होते पर्यायांने अपघात होत नाही.तसेच रस्त्यावर सावलीमुळे वाहनधारकांना डोळ्यांना रखरख होत नाही. अनेक फायदे असल्याने रस्त्याकडे झाडांची नितांत गरज आहे..
प्रा.अतुल देशपांडे
ग्रीन क्लब सदस्य, उत्तूर